अजिंक्यतारा हा किल्ला ‘सातारचा’ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामंध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. येथील किल्ल्यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती या भागात नाही. येथील किल्ल्यांचि सरासरी उची कमीच आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर ६०० मीटर आहे.

Ajinkyatara Fort, Ajinkyatara Fort Trek, Ajinkyatara Fort Trekking, Satara

इतिहास

साताराचा किल्ला (अजिंक्यतारा ) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा, साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज (दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला.

इ.स. १६९९ रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रील १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू मोगलांवर ढासळला व दीडा हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले.

किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा, ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्यांचे नामांतर केले अजिंक्यतारा! पन ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहुच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावा प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोनदरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्हीबुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाटा दिसते व ‘मंगळादेवी मंदिराकडे’ असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.

मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात कशातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी दीड तास लागतो.

गडावर जाण्याच्या वाटा

अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणिअदालत वाड्यापाशी उत्रावे. सातारा ते राजवाडा असी बससेवा दर १० -१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणाऱ्या थेट वाटेने आपण गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागतो व येथून गाडी रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर आपण थेट दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.

राहण्याची सोय

गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात.

जेवणाची सोय

जेवणाची व्यवस्था आपणच स्वतः करावी.

पाण्याची सोय

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

साधारणतः १ तास (साताऱ्यापासून).