अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

Avchitgad Fort, Avchitgad Fort Trek, Avchitgad Fort Trekking, Raigad

गडावरील ठिकाणे

किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास "शरभ" हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या "किल्ले अवचितगड"चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : "श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा." दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.

दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.

पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय

गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.

राहण्यासाठी सोय

गडावर राहण्याची सोय नाही.

कसे जावे

पिंगळसई मार्गः अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी / पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर अंदाजे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युद्धशिळा(वीरगळ) आहे. मेढे मार्गे: मुंबई - रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेढे या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. ही वाट दाट झाडीमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यायातील मेढे व पिंगळसई ही गावे दिसतात. पडम मार्गे: गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वारापाशी घेऊन जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात