अलिबाग हे एक प्रसिद्ध ठिकाण. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिऱ्याच्या दिशेने निघालो की १५-२० कि.मी. वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ३-४ कि.मी. वर कोर्लईचा किल्ला वसलेल आहे. रेवदंड्यापर्यंत बसने जाता येते. इथून कुंडलिकेच्या खाडीवरचा पूल पार करून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे. कारन हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी. म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी ‘कुंडलिकेने सिंधुसागराला अलिंगण दिले. त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे.’ असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे.

Korlai Fort, Korlai Fort Trek, Korlai Fort Trekking, Raigad

इतिहास

हा किल्ला १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यापैकी एक. इथे एक मजबूत कोट आहे. १५९४ साली पहिला बुऱ्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्याअस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला. ठरले असे की निजामाने किल्ला बांधू नये. आणि पोर्तुगीझांनी काही सागरि उपद्रव देऊ नये. पण दुसऱ्या बुऱ्हाण निजमाने मात्र पोर्तुगीझांणा न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीझांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली. आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीझ गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला. शेवटी त्यांनी गड घेतला. मात्र गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या साऱ्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजी अप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले. आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरुज.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

इथल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावा आपण फक्त १० मी. रुंद अशी जागेवर फिरतो. हा बालेकिल्ला. इथून दर्शन होते ते एका विहंगम दृश्याचे. एका बाजूला निळ्याशार सागरावर छोट्या-छोट्या होड्या दिसतात, तर एकीकडे आपण खाडी आणि सागर यांची भेट झालेली पाहतो. इथे एक उत्तराभिमुख चर्चचे अवशेष आहेत. आता आपण उत्तरेकडे वळतो. सर्वप्रथम आपल्याला दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आत जावे लागते. पैकी समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सां दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सां फ्रांसिस्कु. इथे काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठा आहे. पश्चिम आण उत्तर तटबंदीला तोफा स्थानापन्न केल्या होत्या. इथे ७० तोफा आणि ८००० शिबंदी असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. आता जरा उत्तरेला वळलो की आपण इथल्या माचीवर पोहोचतो. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रुज म्हणतात. ही अंदाजे तीन मी. लांब माची आहे. थोडक्यात हा पोर्तुगीज धाटणीचा किल्ला आपल्याला सहजच त्याच्या सौंदर्यात रममाण होण्यास भाग पडतो.

गडावर जाण्याच्या वाटा

सर्वप्रथम आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाई सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. अथव मुरुड-जंजिऱ्याला जाणारी बस आपल्याल गावाच्या वेशीवर सोडते. गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो. एक आहे. समुद्रकिनाऱ्यावरून . इथून पायऱ्या चढून आपण ४० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. गावात होऊ शकते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. किल्ल्यावर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी १ तास लागतो.