मुंबईत असलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात पुरातन किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला होय. मुंबईच्या पूर्व-पश्चिम किनार्‍यांना जोडणार्‍या व माहीमच्या खाडीचे रक्षण करणार्‍या ह्या किल्ल्याला जलमार्गाचा द्वाररक्षक म्हणून ओळखले जात असे.

Mahim Fort, Mahim Fort Trek, Mahim Fort Trekking, Thane

इतिहास

मुंबईच्या बेटांना मुख्य भूमीपासून विभक्त करणार्‍या महकावती उर्फ माहीमच्या खाडीच्या मुखावर इ.स ११४० मध्ये प्रतापबिंब राजाने माहीमचा किल्ला बांधला आणि आपली राजधानीही तेथेच वसवली त्या ठिकाणी नाना जातीच्या व नाना प्रकारचे व्यवसाय करणार्‍या लोकांना बोलावून व्यापार, उदीम, शास्त्र व संस्कृतीची बीजे मुंबई बेटावर रुजवली.

हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर ह्याने सध्या अस्तित्वात असलेला किल्ला नव्याने बांधला. इ.स १६७२ मध्ये पोर्तुगिजांनी माहीमच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ला १०० सैनिक व ३० तोफांनी सज्ज होता; त्यामुळे पोर्तुगिजांना तो जिंकता आला नाही. त्यानंतर १४ फेब्रुवारी १६८९ रोजी जंजिर्‍याच्या सिध्दी याकूत खानाने २५०० सैनिकांनिशी मुंबईवर हल्ला केला. त्यावेळी माहीमचा किल्ला जिंकून त्याने वर्षभर या भागात धुमाकूळ घातला, लुटालुट केली त्यानंतर किल्ला परत इंग्रजांनी जिंकून घेतला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

चारी बाजूंनी भक्कम तटबंदी व बुरुजांचे संरक्षण लाभलेल्या ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार ब्रिटीश स्थापत्यकलेची साक्ष देत उभे आहे. त्यावरील कलाकुसर व दोन्ही बाजूचे उठावदार खांब पहाता येतात. किल्ल्यात झालेल्या अतिक्रमणामुळे बाकी काहीही पहाता येत नाही.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

पश्चिम रेल्वेवरील माहीम(पश्चिम) स्थानकावर उतरुन मोरी रोडने माहीम समुद्र किनार्‍याकडे चालत गेल्यास १० मिनीटात समुद्रावरील माहीमच्या किल्ल्यावर पोहोचता येते.