मुंबई-पुणे हमरस्त्यावरून जातांना दिसणारा हा नावाप्रमाणे बलवान एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधून घेतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला, तसेच जवळच असलेला इर्शाळगड असा चहूबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड.

Prabalgad Fort, Prabalgad Fort Trek, Prabalgad Fort Trekking, Raigad

इतिहास

उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्य निर्मित गुहांमुळेच उत्तरकाळातील शिलाहार, यादव या राज्यकर्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६२६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या आदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराअ मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली. त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच दोन तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी वाटाड्या घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबलगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन चार इमारतीचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाही. मात्र गडावरून माथेरानचे विविध पॉंईंटस्‌ फार सुंदर दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा

शेडुंग मार्गे

मुंबईहून किंवा पुण्याहून येणाऱ्यांनी पनवेल गाठावे. पनवेल पुणे हमरस्त्यावर शेडुंग गावाकडे जाणारा फाटा आहे. एस.टी. चालकांना सांगून शेडुंग फाट्यावर उतरावे. हमरस्त्यावरून जाणारी वाट पकडावी. अर्ध्या तासाच्या रस्त्यावर शेडुंग गाव लागते. शेडुंग गावापासून ठाकूरवाडीपर्यंत चालत यावे. अंतर ५ कि.मी. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथे ची भव्य आणि आकर्षक इमारत आहे. गावातून बैलगाडीची वाट थेट आपल्याला प्रबळमाचीवर घेऊन जाते. प्रबलमाचीवर जाण्यास दीड तास लागतो. प्रबळमाची गावातून समोरच एक घळ दिसते. या घळीतून गडावर जाण्यास एक तास पुरतो. ठाकुर / पर्यंत जाण्यास पनवेलहूनही बसेस आहेत.

पोईंज मार्गे

पनवेल चौक मार्गावर शेडुंगच्या पुढे पोईंज फाटा आहे. तिथे उतरून पोईंज गावात पोहचावे. येथे समोरच असणाऱ्या डोंगर शेंडेवर प्रबळमाची या गावात जावे. येथून दीड ते दोन तासात प्रबलगड गाठावा.

माथेरान ते प्रबळगड

माथेरान जवळील शार्लोट जलाशयाजवळील श्री पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटांत आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिड्यांच्या सहाय्याने दोन तासात आकसर वाडी या गावात पोहोचता येते. आकसर वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काल्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत गडमाथा गाठावा.

गडावर रहाण्याची सोय नाही. शेडुंग गावातील शाळेच्या कट्यावर २५-३० माणसांची झोपण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय आपणच करावी लागते. बारमाही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. गडावर जाण्यासाठी ३ ते ४ तास पायथ्यापासून लागतात.