साल्हेर किल्ला Salher Fort – १५६७ मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा, तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळं समृद्ध झालेला प्रदेश. येथील भूमी तशी सुपिकच त्यामुळे येथील लोकांचे रहाणीमान तसे थोडे उंचावलेले. तरीही डोंगरी भागात कोकण, भिल्ल सारख्या काही आदीवासी जमाती रहातात. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे.

Salher Fort, Salher Fort Trek, Salher Fort Trekking, Nashik

इतिहास

साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून असे पौराणीक स्थान असलेल्या साल्हेरचे शिवकालीन इतिहासातील स्थान देखील महत्त्वाचे आहे. ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते ऐकून पातशहा कष्टी झाला. नि म्हणाला,‘काय इलाज करावा, लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिंवत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बलोलखानास धारून चालवीणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे’. अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले, आणि मोठे युद्ध झाले. सभासद बखरीत याचा उल्लेख खालीलप्रमाणे आढळतो. “चार प्रहर दिवस युद्ध जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वहिले. रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले, असा कर्दम जाहला.

मराठ्यांनी इखलासकान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युद्धात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युद्धात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोड, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापरव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले. खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्राव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो- पातशहा असे कष्टी जाले. ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते. आता समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता, त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यानंतर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

वाघंबे मार्गेगडावर आल्यास उजवीकडे आणि साल्हेरवाडीतून गडावर आल्याश डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न पावलेल्या मंदिराचे अवशेष आढळतात. पुढे थोड्याच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यांसमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. मंदिरापासून वर चढत जाणारी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये रहाता येऊ शकते. गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडामाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग-गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी वाटेवर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा-सातमाळा डोंगरातले धोडप इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगी-तुंगी, तांबोळ्या, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी प्रमुख दोन वाटा आहेत.

वाघांबे मार्गे: साल्हेरला जाण्यासाठी नाशिक-सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्ह्यातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंब अशी एस.टी. अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावा गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.या वाटेने गडावर जातांना चार दरवाजे लागतात. तिसऱ्या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कड्यात खोदलेल्या १८ ते२० गुहा आहेत. चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो. येथून आत आल्यावर समोरच एक पठार दिसते.

साल्हेरवाडी मार्गे: साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा-ताहराबाद-मुल्हर-साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटे कुठेही पाणी नाही.

माळदर मार्गे: गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरत नाही. ही वाट माळदर गावातूनच जाते. सटाण्याहून एस.टी.ने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधुन जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.

राहण्याची सोय गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची व्यवस्थित होऊ शकते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गंगासागर तलाव व त्याच्या बाजूला असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे. गडावर जाण्यासाठी वाघांबे मार्गे अडीच तास, साल्हेरवाडी मार्गे तीन तास, माळदर मार्गे तीन तास लागतात.