सह्याद्री पर्वताच्या उत्तर- दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. सालोट्याचे शब्दांत वर्णन करायचे तर, उंच, बेलाग, सरळसोट, तुटलेला कडा. सालोट्याचे प्रथमदर्शनी रुपच मनात भरते. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला, त्याचा हा जीवाभावाचा सखा.
Salota Fort, Salota Fort Trek, Salota Fort Trekking, Nashik
गडावरील पहाण्याची ठिकाणे
सालोट्यावर प्रवेश करताना वाटेवरच तीन दरवाजे आहेत. ही सर्व प्रवेशद्वारे आजही शाबूत आहेत.पहिल्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची दोन टाकी लागतात. सर्वात शेवटच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडच्या कातळकड्यामधे थंड पाण्याचे सुंदर टाके आहे. येथून पुढे गेल्यावर वाट पुढे वळून वर चढते. पुढे आणखी एक प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर गडमाथा गाठता येतो. पण येथून वर जाण्यास प्रस्तरारोहण करावे लागते. गडमाथ्यावर काही अवशेष नाहीत.सालोट्यावरुन साल्हेरचे अप्रतिम दर्शन घडते.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
गडावर जाण्याचे तीन मार्ग आहेत
१) वाघांबे मार्गे: साल्हेरला जाण्यासाठी नाशिक - सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.
२) माळदर मार्गे: गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते.सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.
३) साल्हेरवाडी मार्गे: साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा - ताहराबाद - मुल्हेर - साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटेत कुठेही पाणी नाही.
राहाण्याची सोय
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
वाघांबे खिंडीतून पाऊण तास लागतो.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



