सरसगड किल्ला Sarasgad Fort – १६०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाणे. येथील गणपती ‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखाला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसर टेहंळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून थेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.

Sarasgad Fort, Sarasgad Fort Trek, Sarasgad Fort Trekking, Raigad

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

तसे पाहीलं तर हा गड दोन ते तीन तासात न्याहाळता येतो. दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हनजे तटबंदी दिसते. दरवाज्यतून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्यचा हौद लागतो. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मात्र अस्तित्वात नाही. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. याच्या जवळच ‘मोती हौद’ आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.

बालेकिल्ल्याचा पायथा :समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक शहापीराचे थडगे आहे. त्याच्या जवळूनच पुन्हा पाण्याची तळी आहेत. जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे, शस्त्रागरे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. येथे दहा -बारा जणांची रहाण्याची सोय होते. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो.

बालेकिल्ला माथा :बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. मात्र या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व परिसर दिसतो. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी मात्र ‘दिंडी’ दरवाजाची एकच वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या डांबरी रस्त्यावरून डावीकडे डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेकऱ्यांना रहाण्यासाठी होत असे. पुढे दरवाजापर्यंत जाण्यासाठी ९६ पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो. पायऱ्यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पायऱ्या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात. दरवाजाच्या समोरच पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती वापरातील नसल्याने या वाटेचा उपयोग कोणी करत नाही.

गडावर तसे पाहिले तर राहण्याची व्यवस्थित सोय नाही. मात्र ७ ते ८ जणांना दिंडी दरवाज्यासमोर असणाऱ्या देवड्यांमध्ये अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते. पण गडावर फार कमी ट्रेकर्स रहातात. जेवणाची सोय आपण स्वतः करणेच योग्य आहे. गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत. पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. गडावर जाण्यासाठी पाली गावाहून दिंडी दरवाजापर्यंत जायला साधारण १ तास लागतो.