सुधागड किल्ला Sudhagad Fort – ५९० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

Sudhagad Fort, Sudhagad Fort Trek, Sudhagad Fort Trekking, Raigad

‘गडकोट म्हणजे राज्याचे मूळ’ गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पूढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला गड विस्ताराने फारच मोठा आहे. गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.

इतिहास

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निगह्ते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येहे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत्त असा उल्लेख आढळतो की, ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. ‘शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून‘ सुधागड’ असे नामकरण केले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

या गडाचा घेरा तसा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. यात ५० जणांची राहण्याची सोय होते. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. येथे जंगलही बऱ्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाड्याच्या बाजूला भोरेश्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाड्यापासून पुढे पायऱ्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे आणून सोडते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.

पाच्छापूर दरवाजा

या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्यकोठारं, भाड्यांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.

गडावरील टकमक टोक

वाड्यापासून आपण पायऱ्यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाटा पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागा मधूनजाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील ‘ टकमक’ टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड, कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

दिंडी दरवाजा

सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणास दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील ‘महादरवाज्याची’ हुबेहूब प्रतिकृती. हे किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र, ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

सवाष्णीचा घाट

तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे. तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. वाट फारच दमछाक करणारी आहे. वाट सरळसोट असल्यामुळे चुकण्याचा संभव कमी आहे. या वाटेने आपण दिंडि दरवाजात येतो.

नाणदांड घाट

एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे. पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो. पुढे एक बावधान, गाव आहे. पुढे पाच्छापुरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.

पंत सचिवांचे वाडे येथे उपलब्ध असून येथे ५० माणसे राहू शकतात. तसेच भोराई देवीच्या मंदिरात देखील रहाण्याची सोय होते. जेवणाची सोय स्वतः केलेली असल्यास उत्तम. पण तसे शक्य नसल्यास गडावरती ‘मोरे’ नावाच्या गृहस्थाचे घर आहे. तेथे ४ ते ५ जणांची सोय होऊ शकते. गडावरतीच अनेक हौद आणि तलाव असल्याने बारामही पाण्याची सोय होते. गडावर जाण्यासाठी दोन तास पाच्छापूर मार्गे, तीन दिंडी दरवाजा मार्गे (धोंडसे मार्ग) लागतात.