सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत.

Surgad Fort, Surgad Fort Trek, Surgad Fort Trekking, Raigad

भिर्‍याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला, व नदितून तीच्या खोर्‍यातून जाणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. खांब गावाजवळील घेरा सुरगडवाडी जवळ असलेला सुरगड हा महत्वपूर्ण गड याच साखळीत आहे.

इतिहास

सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा. शिवरायांनी जे गड नव्याने वसविले त्यात सुरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला.त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते.गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते कि,गडाचा हवालदार व गडबांधणार्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते.

इसवी सन १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला. सुरगडावरून पश्चिमेला कुंडलिकानदीचे खोरे, घोसाळगड आणि अवचितगड दिसतो तर पूर्वेकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो.

पहाण्याची ठिकाणे

घेरा सुरगड गावातून सुरगडावर जाण्यासाठी जंगलातून पायवाट आहे. पायवाट अतिशय ठळक व मळलेली असून चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पायवाटेने मार्गक्रमण करत राहिल्यास डाव्या बाजूला एक विहीर लागते. थोडं पुढे गेल्यास ओढा ओलांडून चढण चढली की पठारावर पोहोचता येते. वाटेत एका फलकावर दाखविल्याप्रमाणे एक रस्ता अणसाई देवीच्या मंदिराकडे जातो तर दुसरा गडाच्या दिशेने जातो. येथून सुरगड किल्ला आणि त्याचे दोन बुरुज न्याहाळता येतात.

पठारावरून डाव्या बाजूच्या पायवाटेने साधारणपणे तासभर चढल्या नंतर आपण घळीत येवून पोहोचतो. हाच पूर्वीच्या काळातील राजमार्ग आहे. जो कर्नल प्रॉथरच्या काळात उध्वस्त करण्यात आला होता. येथे उजव्या बाजूला कातळाच्या पोटात एक पाण्याच टाक असून तेथे एक भुयार आहे. या पाण्याच्या टाक्यात सोडलेली काठी गडावर असलेल्या गुहेतील पाण्याच्या टाक्यात २ दिवसा नंतर पाहायला मिळते असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

पुढे छोटा कातळ टप्पा पार करून आपला गडावर प्रवेश होतो. तेथे उजव्या बाजूला एक हनुमानाची मुर्ती आहे. मिशी आणि़ कमरेला खंजीर असलेली ही हनुमानाची मूर्ती असून त्याने पायाखाली पनवती राक्षसीणीला चिरडलेले आहे. हनुमानाचे शेपूट माथ्यावर आहे. मास्र्ती स्तोत्रातील “पुच्छते मुरडिले माथा” या ओळीची येथे आठवण होते. अशीच हनुमानाची मूर्ती आपल्याला रसाळगड, टीकोना, आणि मुल्हेर या गडांवर पाहायला मिळते.

उजव्या दिशेने पुढे गेल्यास सुरगड माचीवर आपला प्रवेश होतो. माचीवरून ढोलवाल धरण, कुंडलिका नदीच पात्र आणि घनदाट अरण्य असे विहंगम दृश्य पाहायला मिळते. याच माची वरून घोसाळगड आणि अवचितगड दिसतात तर विरुद्ध दिशेला मिर्‍या डोंगर / मिरगड पाहायला मिळतात. या माची वरून वाट उतरताना एक पाण्याचं टाक दिसत. हे टाक साधारणपणे १५ फ़ूट बाय १० फ़ुट असून त्यातील गाळ काढल्यास पिण्याचे पाणी म्हणून वापरता येईल.

घळीच्या डावीकडून चढण गेल्यावर जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. वर चढल्यावर डाव्या बाजूला कोठार आणि पडलेलं हेमाडपंथी मंदिर असून मंदिरात महादेवाची पिंड आणि भैरव आणि भैरवीची मूर्ती पाहायला मिळते. पुढे चालत गेल्यास दगडांची गोमुखी रचना पाहायला मिळते आणि ५ मिनिटे पुढे गेल्यास उजव्या बाजूला हेमाडपंथी मंदिराचे दगड वापरुन बनवलेले दगडी सिहांसन दिसते. त्याच दिशेला पुढे एकमेकांना लागून असलेली ५ पाण्याची टाकी दिसतात (हा गडावरील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे). येथूनच पुढे डाव्या बाजूला सदर असून तिची कालौघात पडझड झालेली आढळते. उजव्या दिशेला चौथरा असून गवातांमुळे तो झाकला गेला आहे.

सदरेच्या उजवीकडे खाली उतरून गेल्यावर ३ टाके आहेत.गुहा टाक्यात दोन खांब आहेत. परत वरच्या दिशेला आल्यावर सदरे समोरील वाटेने गेल्यावर डाव्या बाजूला सुकलेलं पाण्याचं टाक आहे. तेथुनच पुढे चालत गेल्यास डाव्या बाजूला चौथरा असून उजव्या दिशेला बुरुज आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला शिलालेख असून त्यावर २ भाषांमध्ये माहिती कोरलेली आहे, वरच्या बाजूला अरबी भाषेत ज्या ओळी लिहिल्या आहेत त्याचच भाषांतर खाली देवनागरी मध्ये केलेलं आहे. या शिलालेखातून आपल्याला किल्ल्याच्या बांधणीची आणि किल्लेदाराची माहिती मिळते. पुढे शेवटचा ढालकाठी असलेला बुरुज असून खाली पाण्याच टाक आहे. पुढच्या उंचवट्या वर समाधी पाहायला मिळते पण ती कुणाची आहे याची नोंद नाही. पुढे पायवाटेने आणि जंगलातील मार्गाने खाली उतरावे हा गडाचा चोरमार्ग असून तासाभरातच आपण चढून आलेल्या पठारावर पोहचतो आणि तेथून आलेल्या मार्गानेच गावात पोहोचावे. या मार्गावर एक तोफ आहे. पण ती शोधावी लागते.

मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने गडावर संवर्धनाचे काम हाती घेतलेले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानने मुंबई - गोवा हायवे पासून गडाच्या पायथ्या पर्यंत दिशादर्शक फ़लक लावलेले आहेत. पुढे दगडांवर केलेल्या बाणांच्या सहाय्याने गडावर जाता येते.

पोहोचण्याच्या वाटा

मुंबईवरून

मुंबई - गोवा मार्गावरील नागोठणे गाठावे. त्याच्या पुढे १३ किमीवर खांब गाव आहे. खांब गावातून डावीकडे जाणारा रस्ता - वैजनाथ मार्गे घेरासुरगड गावात या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात जातो. मुंबई ते खांब हे अंतर १०३ किमी आहे. खांब गावातून डावीकडे जाणारा रस्ता वैजनाथ गाव मार्गे घेरासुरगड या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो.

पुण्याहून २ मार्गांनी पोहोचता येते

१. पुणे-लोणावळा-खोपोली–पेण–नागोठणे पुढे नागोठणे खिंडीचा घाट उतरल्यावर सर्वात पहिलं जे खांब नावाचं गाव लागतं तिथून डावीकडे वळावे. सध्या इथे दुर्गवीर प्रतिष्ठानने सुरगडाची दिशा दाखवणारा फलक लावला आहे व असे फलक अगदी गडपायथ्यापर्यंत आहेत.खाली डावीकडे खांबगावात पोहचावे आणि मग वैजनाथगाव आणि नंतर घेरासुरगड येथे पोहचता येते. खांब ते घेरा सुरगड हे अंतर साधारणपणे ४ किमी आहे.

२. पुणे- ताम्हिणी घाट मार्गे कोलाड गाठावे. कोलाड येथून खांब हे गाव ७.५ किलोमीटर वर आहे.खांब गावातून वैजनाथ गाव मार्गे घेरासुरगड येथे पोहचता येते.

राहाण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

घेरासुरगड मध्ये जेवणाची सोय नाही. कोलाड मध्ये व मुंबई गोवा हायवेवर जेवणासाठी भरपूर हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

गावातून साधारणपणे दीड तास लागतो.